Letters

पत्र.क्र. ७

*© श्रीधर संदेश*

*मोक्ष*

*( श्रीं नी गु. भगिनी जानकीदेवीस पाठविलेल्या कानडीपत्राचा अनुवाद.)*

मीपणाची जाणीव म्हणजे देहस्थिति नसून स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव घेत घेत मीपणाची जाणीव शिल्लक राहिली म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार किंवा स्वरूपसाक्षात्कार झाला असे म्हटले जाते. अशा रीतीने दुःखाची जाणीव न होतां देहभावाचा अभाव होऊन कुठलीहि चिंता न राहता केवळ एक आनंदाचाच अनुभव शिल्लक राहाणे म्हणजेच जीवनमुक्ति होय. यालाच कैवल्य किंवा मोक्ष असेंहि म्हणतात. ही आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी होय. हेच आत्मज्ञानाने प्राप्त होणारे शेवटचे फळ होय. सिंधुमध्ये पडलेला बिंदु सिंधुरूपच होतो त्याचप्रमाणे सर्व विषयसुखजाणीवरूपी जीव अनंतसुखरूपी परमात्म्यांत एकरूप होऊन म्हणजेच सायुज्यता प्राप्त करून आपले मूळस्वरूप प्राप्त करून घेतो त्यालाच मोक्ष म्हणतात. सुखासाठी संसारांत आलेला जीव सर्व विषयांची दुकानें हिंडून, तेथें सुखप्राप्ति न मिळाल्याने शेवटीं परमात्म्यावर निष्ठा ठेवून त्याच्याच कृपेनें, श्रीसद्गुरुमुखाने आत्मज्ञान मिळवून, संसारसुखांतून बाहेर पडून, आपल्या मूळस्वरूपांत म्हणजेच परमात्म्यांत, केवळ सुख आनंदरूपात विलीन होतो म्हणजेच तो स्वतः केवळ आनंदच होतो. आणि यालाच मोक्ष म्हणतात. अज्ञानरूपी धुकें नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्व ठिकाणी परिपूर्ण असणे यालाच मोक्ष म्हणतात. ज्याच्यांत कोठलेंहि दुःख नसून केवळ आनंदच असतो त्यासच मोक्ष म्हणतात. याच देही व याच डोळा आपले मरण पाहून व जन्महि पाहून तेथे दुसरे काहीहि न राहता स्वत:च शिल्लक राहाणे यालाच जीवनमुक्त म्हणतात. स्वत:ची जाणीव आपल्या अनंतानंत आनंदयुक्त आद्य परमात्मरूपांत विरघळून गेल्याचे म्हणजे विलीन झाल्याचे पहाणे हेच आपले मरण. आत्मज्ञानाच्या दृष्टीने मरण म्हणजे स्वतःची चंचलरूपी जाणीव नाहीशी होणे. निश्चल यथार्थ अशा आनंदरूपांत नित्य निर्विकल्प असणे म्हणजेच देहद्वैत घालवून अद्वैत असें निजरूप-जेथे इतर काहीहि नाही असें- स्वतःच शिल्लक राहाणे. मोक्षासाठीच एखादें नांव धारण केलेला देह असतांनाच अशा रीतीने मरण पत्करून जो जन्मास येतो तो स्वतःच स्वत: असतो. अशास त्यानंतर गर्भवास नाही व मृत्यूहि नाही. जन्ममरणावर विजय मिळवून *’गुरुप्रसादेन मुक्तो भवति पार्वति’* या श्रीशंकरानी पार्वतीस उद्देशून सांगितलेल्या वचनाप्रमाणे, मोक्षानंदसौभाग्य, गुरुप्रसादाने प्राप्त होऊ शकतें हेच स्पष्ट होते. अनन्यभक्तीने केलेली गुरुसेवा परमानंदरूप दिव्यफल देते. जीवनमुक्ताचा देह महासागरांत पडलेल्या बर्फाप्रमाणे वितळून, आनंदरूपी महासागरांत विरून जातो. त्यानंतर देहाभास नष्ट होऊन तो आनंद ब्रह्मरूप परब्रह्मच होतो. तेथें आनंदाशिवाय दुसरे काहीहि असत नाही.

*”क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे च पार्वति” ॥*

ज्ञानी मनुष्याचे संचित, प्रारब्ध व कर्म ही सर्व नष्ट होऊन तो पुनः जन्मास येत नाही. ब्रह्मसाक्षात्कारानंतर *’न पुनरावर्तते । न स पुनरावर्तते ।’ ‘पुनर्नाभिजायते। पुनर्नाभिजायते ।’* आत्मज्ञानी पुन्हा मृत्युलोकांत येत नाही. तो कोणत्याहि लोकांत पुन्हा जन्म घेत नाही हे स्पष्ट करण्यासाठीच वेदानी त्याचा पुनरुच्चार केला आहे. *’परेऽव्यये सर्व एकी भवन्ति ।’* ज्ञानी मनुष्याचे प्राणादि सर्व काही त्या अविनाशी आनंदांतच एकरूप होऊन नाहीसे होते असें श्रुतिवचन आहे.

संचित, प्रारब्ध व आगामी असे कर्माचे तीन प्रकार आहेत. अनेक जन्मांना कारणीभूत असणान्या कर्मास ‘संचित ‘ असें म्हणतात. एका जन्मांतच शेकडो जन्मांना कारणीभूत असें कर्म व संकल्प जीव करीत असतो. त्यांतच या जन्मास कारणीभूत असणाया कर्मास ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. आणि पुढील अनेक जन्मास कारणीभूत ठरणाऱ्या या जन्मीच्या कर्मास ‘आगामी’ असे म्हणतात. देहसुखाची वासना ही जन्मास कारणीभूत होत असते. ती वासना आत्मसुखाच्या अनुभवाने घालविता येते व स्वत: आनंदब्रह्मस्वरूपांत विलीन झाल्यामुळे पुढील अनेक जन्मांना कारणीभूत असणारी संचित, प्रारब्ध, आगामी वगैरे कमें ज्ञानी लोकांच्या *’मी निश्चितपणे आनंदरूप ब्रह्म आहे’* या जाणिवेमुळे संपूर्ण नष्ट होऊन व त्यांच्या जन्मास कारणीभूत असणारे प्रारब्ध आयुष्यमान संपेपर्यंत आपली फळे देऊन आपोआपच नष्ट होते. ज्ञानी मनुष्यांची पापपुण्ये, त्यांचे हितचिंतक व त्याचा द्वेष करणारे हेहि नष्ट होतात. अशा प्रकारे जनन-मरणास कारणीभूत असलेल्या तिन्ही कर्मापासून मुक्त होऊन या जननमरणाच्या चक्रांत ते पुन्हां सांपडत नाहीत असें श्रुतिमाता सांगते.

*सूर्यकिरणाप्रमाणे आनंदरूप स्वयंप्रकाशी असा असलेला मी एक प्रकाशकिरणच आहे* अशी ज्याची दृढ कल्पना आहे त्यास इतर कोणत्याहि कल्पनांची बाधा न होता, ज्याप्रमाणे महा सागरातील लाटा त्या महासागरांतच विलीन होतात त्याप्रमाणे त्याच्या सर्व कल्पना आनंदरूपांतच विलीन होतात. पाण्यावर लिहिलेल्या अक्षराप्रमाणे या सर्व कल्पना आनंदरूपांतच एकरूप पावतात. *’मी अद्वितीय आहे’* ही जाणीव आनंदरूपाशिवाय इतर कोणतीहि असू शकत नाही. माझ्या ठिकाणी इतर दुसरे काहीहि नाही असें निश्चित ज्ञान सातत्याने असणे किंवा त्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच प्रकाश त्या प्रकाशामुळे देहांत असलेल्या कामक्रोधादि विकारांच्या बाधेने मनाच्या ज्या कल्पना आहेत त्यांना बाह्यप्रपंच दृश्याने सुध्दा बहिर्मुखता राहू शकत नाही. त्याचे मन दिसेनासें होते. त्या प्रकाशामुळे जन्ममरणाची कल्पनाहि नष्ट होते आणि त्यालाच मोक्ष म्हणतात.

*॥ इति शम् ॥*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img