यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्यं हि मतं मम ॥ (महाभारत) जीवमात्रांचे आत्यंतिक हित ज्याच्या योगानें होतें, तेंच सत्य म्हणून भारताचे मत आहे. त्रिकाल सत्य असणारेंच खरोखरीचे हित म्हणून इथे उद्घोषित केलें आहे. त्रिकालीहि जें अबाधित असते, कसलीहि विकृति म्हणून ज्याला होत नाही, जे नित्य एकरूप असतें तेंच एक सत्य म्हणून म्हटले जाते. या शाश्वत सत्याचा शोध करणेंच आम्हा सर्वांचें अंतिम खरेखुरे हित होय, हेच एक कर्तव्य होय.