देवदर्शनास जाणाऱ्या श्रीमंतानाही देवापुढे एक दोन रूपये ठेवण्याची कधीच इच्छा होत नाही. पण स्वतःस आवश्यक वाटणारे वर मात्र तो मागत असतो. अति श्रीमंताना ‘ तुम्ही देवास अर्पण करण्यास काय देऊ शकाल ? ‘ असे विचारले तर तो ‘ महाराज ! मजजवळ देण्यासारखे काहीही नाही ‘ असे म्हणून आपले दारिद्रय दाखवितो. अशा लोकांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण होतील ?
परमात्म्याचें अनन्यपणे भजन करणाऱ्या भक्तांची सर्व जबाबदारी परमात्मा स्वतःवर घेतो. अनन्य म्हणजे ज्यांना दुसरे कोणी नाही असा. दुसरा कोणताही आश्रय आहे अशी कल्पना केली तर ती अनन्यता होत नाही. म्हणून अनन्येंत गर्क होऊन देहाचीही विस्मृती झाली पाहिजे.
श्री गुरूकडे किंवा देवदर्शनास जाणारा प्रत्येक मनुष्य आपली अनेकानेक दुःखे सांगून त्यांच्या निवृत्तीचा मार्ग विचारीत असतो. त्याच्या व्यवहारांत आलेली विघ्ने श्रीगुरू किंवा श्रीदेवाच्या कृपेने निवारण करून आपापली कार्ये तो सिध्दीस नेऊ शकतो. मात्र काम झाल्यावर देव, गुरू सानिध्याचे महत्व विसरून *’ मी यंव केले, मी त्यंव केले ‘* अशी प्रौढी मारीत असतात. उत्तम वकील दिला म्हणून मी न्यायालयांत यशस्वी झालो, निष्णात वैद्याच्या औषधामुळेच माझा रोग बरा झाला,, अशी तो् वल्गना करतो. या कारणाने परमात्म्याचाही त्याच्यावरील विश्वास उडून क्रमाक्रमाने तो दरिद्री बनतो.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*