अलीकडच्या उत्क्रांतिवादावरूनहि वेदांचे अपौरुषेयत्व सिद्ध होते. जगाची दिवसेंदिवस उत्क्रांति होत आहे, असा या वादाचा सिद्धांत आहे. याला Theory of Evolution’ ‘ उत्क्रांतिवाद’ असें म्हणतात. ‘विकासवाद ‘ असेंहि याचे दुसरे नांव आहे. पुढपुढचा प्रगल्भ काल हा अधिकाधिक उत्कर्षाचा व मागमागचा काल अधिकाधिक मागासलेला असे या मताने ठरतें. मागचा काल म्हणजे पशुतुल्य, रानटी जीवनाचा, ज्ञानशून्य काळ असे या मताचे लोक म्हणतात. वेदांचा काल अतिप्राचीन. तेव्हां त्या काळांत यांच्या सिद्धांताप्रमाणे कोणालाच कसलें ज्ञान असू शकत नाही. अशा काळी झालेला वेद, आजच्या उत्क्रांतीच्या कालांतहि इतका आदरणीय आणि अनुकरणीय ठरतो व विश्वमान्य होतो, तें केवळ त्याच्या अपौरुषेयत्यामुळेच हें कोण नाकबूल करील ? या उत्क्रांतिवादाच्या आधुनिक विद्वानांच्या सिद्धांता प्रमाणेंहि, वेद ही मनुष्यकृति नसून ती परमात्मकृति आहे, हे सरळ सिद्ध होते. वैदिक धर्माचा प्रणेताहि परमात्माच; हेंहि ओघानेंच प्राप्त होते.
अपक्रांतिवादानेंहि वेदाचें अपौरुषेयत्व सिद्ध होते. दिवसेंदिवस प्रति प्राणिपदार्थाचा ऱ्हास होत जातो. प्रतिवस्तु प्रतिक्षणी क्षीण होत होत शेवटी नष्ट होते. क्रमशः नाशच होत जातो. तेव्हां दिवसेंदिवस पूर्वीपेक्षां क्षीण होत जाणे या नियमानुसार, जगाचा उत्तरोत्तर उत्कर्ष न होतां अपकर्षच हो जातो. असा या अपक्रांतिवादाचा सिद्धांत आहे. उत्तरोत्तर दिवस गेल्या होणारें सर्व अपूर्ण, निःसत्व, शक्तिहीन होते. या मतानुसारहि जगदुत्पत्तिकाला झालेला वेद, साहाजिकपणें सर्वांपूर्वीच्या परमात्म्याकडे आपले कारणत्व दाखउन, आपलें अपौरुषेयत्व सिद्ध करतो व पूर्णत्व स्थापितो. पूर्वशक्ति उत्तरो राहात नाही, या दृष्टीने जगत्उत्पत्तीच्या दुसऱ्याच क्षणापासून, जगा अपक्रांतीला सुरुवात झाल्यानें, जगदुत्पत्तीच्या नंतरचें वाङ्मय पूर्ण होऊं शकत नाहीं. या सर्व विचारानें कोणतें तरी एक, असें पूर्ण वाङ्मय मानावेंच लागते. वेदापेक्षां प्राचीन वाङ्मय दुसरें आढळत नाहीं. वेदाची उत्पत्ति परमात्म्या पासूनच झाली याचें भरपूर प्रमाणहि सांपडतें. या दृष्टीनें वेदाचें अपौरुषेयत्व सिद्ध होतें. पूर्ण स्वरूपाचा बोध करणारे सर्वांगपरिपूर्ण वेद, जगदुत्पत्तीनंतर उत्पन्न न होतां ते जगदुत्पत्तीपूर्वीच, सर्वज्ञ परमात्म्यापासूनच उत्पन्न झाले असें तर्कानेंहि सिद्ध होतें.