इहलोकातील विषयसुख किंवा देवलोकांतील दिव्य सुख काय ? ती दोन्ही अपूर्ण अशाश्वतच. ती मिळवण्यात काय अर्थ आहे ? विषयवासना सोडून मिळणारे सुख तेच अचल, शाश्वत सुख होय. ते प्राप्त करुन घेणे हे मानवीजीवनातील साध्य होय. मन निर्विषयी करुन अनंंतसुखाचा लाभ बुद्धीनेच मिळवणे योग्य होय.
काहीही न करताच मनुष्य आपल्या जन्मात नित्य, शाश्वत सुख प्राप्ती करून घेऊ शकत नाही. कारण जन्म हे एक साधनच आहे. आपण जशी इच्छा करु तसेच फळ मिळणार . जन्मापासून आतापावेतो त्याने इंद्रियसुखासाठीच धडपड केली आहे. मन इंद्रियाच्या मागे लागलेले आहे. ज्याला बाह्यसुख म्हणतात ते इंद्रियामुळे समजले जाते आणि हेच शाश्वत सुख आहे अशी आपण समजूत करून घेतो. इंद्रिये व मन ही बहिर्मुख आहेत. त्यामुळेच विषयसुख हेच स्वाभाविक सुख आहे अशी आपली समजूत असते. पण तो निव्वळ भ्रम आहे. कारण त्रिकालबाधित सत्य तेच शाश्वत सुख होय. म्हणून मानवीजीवनाचे ध्येय शाश्वत सुख, अचलसुख, नित्यसुख मिळवणे हेच आहे. मागील जन्मी इंद्रियाच्या आहारी जाऊन बाह्यसुखासाठी केलेल्या कर्माचे फळ म्हणजेच हा जन्म. मानव जन्मतःच कोणतेही कार्य हाती घेत नाही. पूर्वसंस्काराच्या योगाने सुचणारी कामेच तो करतो. अशावेळी आपण पूर्वजन्मी काय केले होते ? हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर म्हणजेच या जन्मी केली जाणारी कर्मेच !
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*