Literature

परमार्थ

परमार्थ ह्या विषयावर आज मी चार शब्द सांगणार आहे. संसारी मनुष्यासच परमार्थाची विशेषेकरून जास्त आवश्यकता आहे. परमार्थ साधण्यासाठी जास्त प्रयत्न करणे अगत्याचे आहे. ‘सत्संगोहिभेषजम् ।’ भवरोग, संसाररूपी व्याधी नष्ट करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजेच सत्संगति. ‘सत्संगतिरेवात्र कारणं प्रथमम् ।’ ह्यासाठी पहिले सुलभ साधन आपणांस माहीत असल्यास त्या अनुरोधाने संसाररूपी रोग नष्ट करता येईल. ते पहिले साधन म्हणजे ‘सत्सहवासच’. त्याखेरीज इतर कोणतेही साधन नाही. ‘मुक्तिः सम्पाद्यते राम दृढा ।’ ह्या सत्संगतीने मुक्ति प्राप्त होते. हा भवसागर तरून जाण्यास योग्य नाव म्हणजेच सत्संग. भागवतामध्ये असे म्हटले आहे की, ‘नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् । मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान्भवाब्धिं न तरेत्स आत्महा।।’

( भाग स्कंध ११ ) हा नरदेह दुर्लभ आहे. पशूप्रमाणे त्या देहावर विषयसुखासाठी प्रेम करणे म्हणजे नरकमार्गाप्रत जाणेच. म्हणून विषयसुखाच्या लालसेसाठी देहास महत्त्व देऊ नये. विषयसुखकामनेसाठी देहप्रीति, ही पारमार्थिक सुखाच्या दृष्टीने निषिद्ध आहे. म्हणून ह्या देहाचा गौरव किंवा प्रेम निंद्यच. मानवी देह विषयसुखाचे साधन नसून तो परमार्थासाठीच उत्पन्न झाला आहे. ह्यासाठी त्याचा उपयोग पारमार्थिक सुखाचे साधन म्हणून केला पाहिजे. विषय तर सर्व ठिकाणी आहेतच. त्यासाठी नरदेहावीच आवश्यकता आहे असे नाही. अशन, पिपासा वगैरे पशूंनाही आहे. परंतु गुरुकृपेच्या आधाराने भगवंताची कृपा संपादून ह्या संसारजालातून मुक्त होणे हेच नरदेहाचे वैशिष्ट्य आहे. श्रीमद्भागवतात असे म्हटले आहे की, हा देह संसारसमुद्र पार करणारी सुंदर अशी नाव आहे. ही नाव चालविणारे नावाडी सद्गुरूच होत. ही नाव योग्यरीतीने परतीरास नेण्यास सद्गुरूंची कृपा अत्यावश्यक आहे. सद्गुरूपेक्षा इतर कोणीही ह्या ब्रह्मांडात आपला हितचिंतक नाही. तत्त्व समजवून सांगणारा गुरूच. सद्गुरूंच्या सान्निध्याने व मार्गदर्शनाने हा संसारसागर पार होणे हे आपले कर्तव्य. आपल्या हितासाठी चिर सुखाची इच्छा धरून त्याप्रीत्यर्थ प्रयत्न न केल्यास देवानुग्रह दुर्लभच.

‘दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् ।
मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरूषसंश्रयः ।।

जगांत दुर्लभ अशा तीन गोष्टी आहेत. केवळ मनुष्य जन्मास आला म्हणून कोणीही मुक्त होत नाही. उलट पशुवृत्तीने आयुष्य घालविल्यास तो दुःखपरंपरेच्या गर्तेतच सापडतो. ज्याला विषयसुख क्षणभंगुर वाटते, खन्या सुखाची ज्याला कल्पना असून विषयसुख नरकाचा मार्ग वाटतो अशा मनुष्याने योग्य असे धर्माचरण करून ह्याच जन्मी जीवनसाफल्य प्राप्त करून घेतल्यास त्यास पुनर्जन्माची शिदोरी प्राप्त होत नाही. ह्याच जन्मी ह्याच देही परमात्म्याची कृपा संपादन करून त्या सुखात विलीन होऊन, एकरूप होऊन जीवनमुक्त व्हावे असे ध्येय संपादणे हेच मनुष्य जन्माचे इतिकर्तव्य. ह्या उलट वागणे म्हणजे पशुवृत्ति किंवा राक्षसीवृत्तीव म्हणावी लागेल.

ह्या दृष्टीने विचार केल्यास मानव जीवनसाफल्य म्हणजे निर्विषय सुखप्राप्तीच. त्यासाठी जन्म घेतल्यापासून मृत्यू प्राप्त होईपर्यंत आपल्या शक्तीप्रमाणे प्रयत्नशील असले पाहिजे. सर्व जन्म घालविला तरीहि विषयसुखानें मनुष्य सुखी होतो असे कोणीही सांगू शकत नाही. खारट पाणी पिल्याने तहान भागल्याचे कोणी पाहिले आहे काय ? विषयसुखाने असमाधानच होते. पण त्या सुखाची चटक नाहीशी होत नाही. निरनिराळ्या साधनांमुळेहि सुखप्राप्ती होत नाही; असा विचित्र अनुभव संसारात पदोपदी येत असतो. म्हणून मानवास संसारापेक्षा दुसरा कोणीही शत्रु नाही. ह्या नरदेहात खरे सुख कोणते ? त्या सुखाने कोणती प्राप्ती होते ? त्याचे सत्यस्वरूप काय, हे सर्व समजावून घेण्यासाठीच हा नरदेह आहे. विषयापासून मिळणारे सुख हे खरे सुख आहे काय ? हा मानवजन्म कसा मिळतो ? जन्ममरणाच्या तडाख्यातून सुटण्यास काय केले पाहिजे ? ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे हे मानवी जन्माचे आद्य कर्तव्य होय. परमात्मा जगनिर्मिती करून त्यातच लपून बसला आहे. जग हा एक खेळ आहे. त्यात नाना प्रकारचे जिन्नस उत्पन्न करून पशु, पक्षी, देव, गंधर्व, मानव अशा अनेक योनी निर्माण करून ह्यांपैकी आपणांस कोण शोधतो ? हे समजून घेण्यासाठीच परमात्म्याने निर्मिलेला हा खेळ आहे. अनेक प्राण्यांची निर्मिती करून मग मनुष्य देह निर्माण झाला. आपले स्वरूप मनुष्य देहातच प्रगट होऊ शकते हे पाहून परमात्म्यास फारच आनंद झाला. ‘आत्ममयो ह्ययं पुरूषः ।’ आपल्यातच हे जग कल्पून संकल्परूपी पडद्यावर परमात्म्याचे हे जगच्चित्र रंगविले आहे. परमात्माच पडदा, चित्र, रंग, चित्रकार व पाहणारा आहे. म्हणजे सर्व कांही तोच आहे. व्यवहारदृष्ट्या ह्या सर्व गोष्टी निरनिराळ्या दिसतात. एखादा कादंबरीकार कादंबरी लिहितो त्यावेळी तो कादंबरीकारच निरनिराळ्या पात्रांच्या भूमिकांमधून स्वतःस गुरफटवितो. त्या कादंबरीत वर्णन केलेले उद्यान, सृष्टिसौंदर्य सुखदुःखे व ती अनुभवणारा तो लेखकच असतो. ह्या कल्पनेप्रमाणे कादंबरीकार प्रत्यक्षात नसलेले सत्यरूपात चित्रित करतो, त्याप्रमाणेच परमात्मा संकल्पाने सर्व निर्माण करून शेवटी मनुष्य देह निर्मून त्यात आपले स्वरूप पहातो, आपले रूप म्हणजेच मानवरूप असे समजतो. परमात्मा हेच मानव देहाचे वैशिष्ट्य. मानवदेह व परमात्मा ह्यांचे संबंध कोणते ? ह्या देहात खऱ्या सुखाची प्राप्त कशी होऊ शकते ? अर्सा विचार करणे हेच मानवबुद्धीचे योग्य काम. मानवीजन्मात रूढ अशी जी विषयसुखे आहेत त्यांत खऱ्या सुखाची प्राप्ती होत नसल्याकारणाने त्या खऱ्या सुखप्राप्तीसाठीच जीवनधारा वाहवणे हेच जन्माचे सार्थक होय. परमात्मप्राप्तीसाठीच आपले जीवन घालविणे ह्यालाच ‘परमार्थ’ असे म्हणतात. द्रव्यामुळे सुखप्राप्ती होत नाही. ह्यासाठी ‘अर्धमनर्थ भावय नित्यम्, नास्ति ततः सुखलेशः सत्यम्’ असे श्रीमद्भगवत्पादानी म्हटले आहे. ह्या सुप्त धनामध्ये आपले मन गुंतवून, त्यात आसक्त होऊन आपला मेंदू बिघडवू नये. म्हणजेच ह्या क्षणिक सुखासाठी हा नरदेह वाया घालवू नये.

चित्रामधील जलाभासाने तहान शमत नाही. चित्रात पाणी दिसते. ते पिऊन कोणीतरी तृप्त झाला आहे काय ? दुसरे उदाहरण मृगजलाचे देता येईल. मृगजलाकडे हरीण पाण्याच्या आशेने धावत सुटते. पण ते जसजसे जवळ जाते तसतसे मृगजलही दूर दूर भासत असते. मृग सारखा पळत असतो व खूप धावपळ करूनहि त्यास पाणी मिळत नाही व तहानेने व्याकुळ होऊन मरण ओढवण्याचीहि शक्यता असते. अशीच विषयी माणसाची गती ठरलेली आहे.

प्रथम मुलांचे उपनयन, मग लग्न, मग मुलींची लग्ने नंतर नातवंडांची उपनयने, लग्ने व हे संपल्यानंतर सर्वसंगपरित्याग करू असे मानव मनात ठरवितो. मुलींची लग्ने होतात, मग नातवंडे होतात व हे सर्व होऊन कांही वर्षे लोटून गेली तरी त्यांचे पुढील संस्कार पहावेत ही आशा कायमच असते. ह्याप्रकारे विषयी जनांची आशा दिवसेंदिवस वाढत असते. आशारूपी अग्नि सर्वभक्षक आहे. संसारात सर्व कांही ठाकठीक करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्ण होत नाही. शेवटी मनुष्याचे आयुष्य संपते व अपेक्षा नसतानाहि त्यास यमराजाचे पाहुणे व्हावे लागते. पण वासना शिल्लक राहाते व तीमुळे त्याचे ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ हे चालूच राहाते.

संसार हे एक घड्याळ किंवा रहाटगाडगे आहे. मात्र निसर्गाचे वैचित्र्य पहाण्यासारखे आहे. तारुण्यात विशेष आशा नसते पण तीच वृद्धपणीं वृद्धिंगत होते. नातवंडांनी शिव्या दिल्या तरी आपला प्रपंच कसा चालेल ह्याच चिंतेत तो मग्न राहातो आणि हीच वासना पुनर्जन्मास कारणीभूत असते. वासना नाहीशी झाल्यास जन्मप्राप्तीही नाहीच. परंतु निसर्ग, म्हातारपणीच जास्त आशा उत्पन्न करीत असतो. वैषयिक जीवनात सुख-समाधान नाही, कारण विषयसुखे समाधानकारी नाहीत. खरे सुख किंवा समाधान परमात्मकृपेनेच मिळते अन्यथा मिळत नाही. विषयनिवृत्तीत खरे सुख आहे. निरनिराळ्या तऱ्हेने आपल्या जीवनात अनुभवास येणान्या वासना नष्ट करण्यासाठी बुद्धीचा वापर करण्याचे भाग्य आपणास आपोआप प्राप्त होईल. इंद्रिये हा एक घोडा आहे अशी कल्पना केल्यास बुद्धी हा घोडेस्वार व मन हे लगाम आहे. घोडेस्वाराकडून लगाम नीटपणे वापरला गेल्यास घोडा इकडे तिकडे जाऊ शकणार नाही. देहरूपी रथास विवेक हा सारथी आहे. बरे वाईट कोणते ? प्रसंगोपात्त काय करावयाचे? हे ठरविणे विवेकाचे काम आहे. योग्यायोग्य ठरविणारी बुद्धी म्हणजेच विवेक. हा नरदेह परमात्म प्राप्तीसाठीच आहे असे निश्चितपणे समजून गुरुमुखाने सांगितलेली सत्कर्मे, सदुद्देश ह्यांचे विचार दृढ करीत करीत आत्मसुख मिळविणे हाच नरदेहाचा आदर्श असून हेच नरदेह साफल्य. बाकी इतर सर्व ठिकाणी अशांती, असमाधान, द्रव्याचा मोह व त्याचे दुष्परिणाम यांचे निरीक्षण करणारे कांही उत्तर प्रदेशीय साधु मला भेटले होते. त्यांच्या तोंडी नेहमी उद्वेगाची भाषा असावयाची. मी त्यांना ‘असे कां ?’ असे विचारले असता त्यांनी, ‘स्वामी, अन्नाप्रमाणे मनुष्याची बुद्धी होते. कारण आमच्या छत्रासाठी जो पैसा येतो तो सर्व मारवाडी लोककांकडून येतो. मारवाडी लोक पैशाच्या थैल्या उरावर घेऊन प्राण सोडतात व त्यांच्या पैशांनीच आमची छत्रे चालतात. त्या छत्रातील अन्न आम्ही खात असल्यानेच आमची मने अशांत आहेत. असे उत्तर दिले.

पैशाचा मोह मरणापर्यंत आवरता येत नाही. मरणाच्या वेळीही पैशाकडे पहाण्याचा मोह होतोच. परंतु तो पैसा आपल्या बरोबर येऊ शकत नाही असा विचार मात्र त्यावेळी येत नाही. अशा स्थितीत कोणतेहि तप साधणे शक्य नाही. अनुष्ठानासाठी योग्य व परिपूर्ण असा वेळ जीवनात मिळू शकतो काय ? थोडेसे स्वास्थ्य मिळताच कोर्ट, कचेरी, व्यवहार इत्यादींचे विचार मनात येतात. ज्यावेळी जीवनसमस्याच बिकट होते त्यावेळी संसारत्याग कसा शक्य होणार ? असा प्रश्न निर्माण झाला असता शास्त्र ‘दान’ हा मार्ग सुचविते. दानामुळे भगवतकृपा होऊ शकते. देवपूजेसाठी द्रव्य खर्चणे, गरजूंना दानधर्म करणे हे सर्व भगवत्कृपेसाठीच. एकंदरीत कोणत्या तरी प्रकारे त्यागानेच सुखप्राप्ती होऊ शकते.

‘भिक्षुका नैव भिक्षन्ति बोधयन्ति । भिकारी घरोघरी जाऊन ‘आई भिक्षा बाढ’ असे ओरडून भिक्षा मागतो. भिकारी दाराशी आला म्हणून आपण त्रासून जाऊ नये. कारण ते भिक्षेसाठी आले असले तरी ते एक तत्व समजून सांगत असतात. ‘भिक्षा वाढा’ ह्याचा आम्ही दान न केल्यामुळेच आम्हास ही परिस्थिती प्राप्त झाली आहे. म्हणून तुम्ही तरी दान न करून आमच्या स्थितीस येऊ नका.’ हाच अर्थ नाही काय ?

सर्वात मोहकर वस्तू कोणती ? ह्याचा शास्त्राने शोध केला आहे. पैशासाठीच व्यवहारात भाऊबंदकी सुरू होते. गुरु शिष्यांतहि बाद निर्माण होतो. कमी जास्त खर्च केल्यास स्त्रीपुत्रांनाहि राग येतो, ‘पैसा फार वाईट रे बाबा’ अशा अर्थी कन्नड भाषेत एक म्हण आहे.

दान हे एक महान तप आहे. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ व संन्यास ह्या आश्रमांत दान करणे शक्य नसते म्हणून गृहस्थाश्रमीयांसाठी दान करणे हा तपाचा विशेष प्रकार सांगितला आहे. दान घेण्यासाठी महात्मे आपणाकडे येतात. त्यामुळे कृतज्ञतेने, भक्तीने दान करा ! अन्नदान करा. मोह आदींच्या निरसनासाठीच दानधर्माचा विधि आहे. जगात सर्व कांही चालू असते. आपणासाठी, आपल्या उद्धारासाठी परमेश्वरकृपेनें हे सर्व चालले आहे. दानाने ज्ञान व सामर्थ्य देणाऱ्या श्रीगुरुरूपी परमात्म्याची सेवा तुम्ही काया, वाचा, मनाने करून आदर्श जीवन जगून कृतार्थ व्हा !!

इति शम्!!

home-last-sec-img