सुरवातीस एकटाच असलेला परमात्मा मीपणाचा अंकित असून आपल्या इच्छेनुरूप एकामागून एक अशी असंख्य व अनंतरूप सृष्टी निर्माण करून तिच्यात स्वतः व्यापून राहिला आहे. म्हणून कोणताही जिन्नस पाहिला किंवा कोणासही विचारले तर *’ सोऽहं ‘* शिवाय दुसरे काहीही नाही म्हणजेच सर्व परमात्मरूपच. बाह्यसृष्टीत परमात्म्याच्या संकल्पाप्रमाणे नाम, रूप, गुण, जाती इत्यादि भिन्न भिन्न दिसत असले तरी सर्व एकमेव परमात्मस्वरूपच
भिन्न भिन्न स्वरूपापासून त्याला मीपणाची जाणीव झाली त्यात तोच तो अंतर्भूत आहे. म्हणून कोणतेही शरीर घेतल्यास त्याला मीपणाची जाणीव असतेच. भिन्न भिन्न धारणेमुळे अनेकत्व भासमान होते. मीपणाची जाणीव सर्वसाधारणपणे सर्वांतून दिसून येते. एकरूप असलेल्या परमात्म्याने आपल्या संकल्पनेने अनेक रूपे धारण करून ही सृष्टी निर्मिली हे स्पष्ट आहे. ‘ अनेकत्व टिकविण्यासाठी परमात्म्याने पंचमहाभूतांची रूपे घेऊन अनेकत्व दाखविणारी नांवे व रूपे धारण करून आपल्या अंशमात्र असलेल्या जगताची निर्मिती केली ‘ अशारितीने आपली वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती यांना परमात्मस्वरूपाचे वर्णन केले आहे.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*