खिरीच्या भांड्यात एक थेंब राॅकेल पडल्याप्रमाणे कार्य करताना थोडे जरी ‘अहं’ आले तर केलेले सर्व कार्य व्यर्थ जाण्यास मुळीच वेळ लागणार नाही. आपली स्तुती केली तरीही आपण निरहंकारित्व कमी होऊ न देता वाढविले पाहिजे. आपण कितीही सत्कार्ये केली तरी ती ‘कमीच’ वाटली पाहिजे व अधिक करण्यासाठी मनाचा उत्साहही वाढविला पाहिजे. कर्तृत्व व भोक्तृत्वाचा थोडाही स्पर्श न होऊ देता अभिमान सोडून कर्तृत्वबुद्धीने निष्काम कर्मे करणाराच साधक होय. त्याचे आचरण सत्यास व शास्त्रास सोडून असू नये. तो सर्वांचा विश्वासपात्र असावा. त्याचे जीवन इतरांना अनुकरणीय व आदरणीय असले पाहिजे. त्याने निंदेने निराश होऊ नये तसेच स्तुतीमुळे उल्हासित होऊ नये. सर्व प्राणीमात्रांवर शुद्ध आत्मीय प्रेम असावे.
सर्वांशी विनयाने वागावे. कोणावरही निष्ठूर न होता आपण सर्वांचे प्रीतीपात्र बनणे महद्भाग्याचे लक्षण होय. निष्कपट प्रेम व मृदु मधुर वचन, आचरण हा जगत्वशीकरणाचा महान मंत्र होय.
आपली चूक ओळखून ती चूक होऊ न देता पश्चात्तापाने वाईट वाटून घेणाराच आपला उद्धार करून घेऊ शकतो. आपली चूक ओळखणाराच मुमुक्षू तर दुसऱ्याचे दोष पाहून आपले दोष छपविण्याचा निरनिराळे प्रयत्न करणाराच बद्ध.
*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*