धर्माप्रमाणे आचरण करणाऱ्यास सुख प्राप्त होते. सुखासाठी धर्माचरण करा, असे वेदामध्ये सांगितले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या चारामध्ये पहिला पुरुषार्थ मुख्य असून त्यामुळेच उरलेले तिन्ही पुरुषार्थ साधणे शक्य होते. धर्माने अर्थ, अर्थाने काम म्हणजेच धर्म अर्थ काम हे तिन्ही पुरुषार्थ यथाक्रमाने व योग्य रितीने साधल्यास चौथा जो मोक्ष तो आपोआपच प्राप्त होईल. धर्म मार्गात राहून कर्माचरण करणाऱ्यांचे चित्त स्थिर होऊन मनःशांती मिळते. व त्यायोगे सुख प्राप्त होते आणि शेवटी मोक्षही साधतो. या चार पुरुषार्थातील मुख्य पुरुषार्थ धर्मच होय.
अधर्मचरणाने सुखप्राप्ती होत नाही. तसेच अधर्माने मिळवलेला पैसाही टिकत नाही. अधर्माच्या मार्गाने केलेली कामे फलप्रद होत नाहीत. मानवी जीवनात अधर्मचरणाने अप्रतिष्ठा प्राप्त होते. अधर्मी मनुष्यास सर्व लोक दुरुनच निरोप देतात. *दुर्जनं प्रथम वन्दे |* ही म्हण सर्वांनाच माहित आहे.
वेश्येला समाजात स्थान नाही. तिच्याजवळ सौंदर्य व धन असते. पण तिच्यात धर्म भावना असू शकत नाही. त्याउलट एखादी दरिद्री पण पतिव्रता असलेली स्त्री समाजात आदरणीय असते. म्हणूनच सदाचारच सद्धर्म होय असे म्हटले आहे.
*श्री .प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*