प्रेमानेच माणसे वश होतात. त्यामुळे भावनाप्रधान असलेल्या परमात्म्यासंबंधी भक्ति हीच योग्य परिणामकारी आहे यात आश्चर्य कोणते ? भावांतच परमेश्वर असतो म्हणून भावनेच्या बलानेंच त्याला वश करून घेतले पाहिजे.
*’भक्त्या मामभिजानाति यावान् यस्चास्मि तत्त्त्वतः |*
*ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् |*
‘भक्तीच्या योगानेच माझे भक्त माझे स्वरूप यथार्थत्वाने जाणतात व यथार्थत्वाने माझे स्वरूप जाणणारे असे माझे भक्त आहेत ते माझ्यातच विलीन होतात. ते माझ्यापासून भिन्नत्वाने शिल्लकच राहू शकत नाहीत. ‘ असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. परमात्मपद भक्तीतच प्रविष्ट असल्याने परमात्मा भक्ताधीन आहे. म्हणूनच परमात्मप्रीतीसाठी भक्तीशिवाय इतर कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. अविचल अशा भक्तीनेच भगवान तृप्त होतात. इतर कोणत्याही कारणाने तो तृप्त होत नाही.
भगवंतास भक्तिप्रिय असे म्हणतात. भक्तीरूपीपाशानेच भगवान बद्ध होतो. असे पुराणोदिमधून सांगितले आहे.
लौकिक व्यवहारांतसुद्धा प्रीतीसारखे दुसरे कोणतेही बंधन नाही. नानाप्रकारचे पाश असले तरी प्रीती पाशासारखा दुसरा कोणताही पाश नाही. प्रेमपाशाचे लक्षण अतिशयच विलक्षण, प्रेमपाश लोखंडी गजापेक्षाही महाकठीण आहे. प्रेमपाश तोडणे कोणासही शक्य नसते.
*श्री.प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*