एकाच क्रियेने सर्व जग आपल्या स्वाधीन ठेवण्याची इच्छा बाळगणाऱ्याने, जिंकण्यास कष्टकर असलेली सर्व इंद्रिये नेहमी आपल्या ताब्यात ठेवावीत असे ज्ञानी लोक सांगत आले आहेत.
*’ निस्पृहस्य तृणं जगत् | ‘* निस्पृह, विवेकी हे सर्व जगाला गवताप्रमाणे मानून पंचेन्द्रिये व कामक्रोधादि षड्रिपूंचा पराभव करून हे जग मिथ्या आहे असे समजून सत्यसुखाची प्राप्ती करून स्वयंप्रकाशी होऊन जगतात.
निर्विकल्प मनोवृत्तीच्या योगाने मोक्ष साधणे सोपे आहे. कर्म, उपासना, आश्रमधर्म परिपालन ही सर्व मनःशुध्दीची साधने होत. या साधनांनी ह्रदयस्थ किल्मिष स्वच्छ करून ती टाकुनच मन शुध्द बनते. क्रमाक्रमाने प्रफुल्लित झालेले ह्रदयकमल आत्मज्ञानाने स्वयंप्रकाशी होईल. यालाच मनाची निर्विकल्पस्थिती म्हणतात. अशी स्थिती प्राप्त होताच निवृत्तिमार्ग आक्रमुण मानवजन्माचे सार्थक होते. सुखस्वरूप असे मोक्षप्रद मिळविणारा मोक्षमार्गप्रवर्तक योगी जगाच्या हितासाठीच कष्टत असतो.
मोक्षकारक साधनेत सुरवातीला प्रवृत्तिमार्गातून जात असता त्यातून निवृत्तिमार्गाकडे येणे अशक्य असते किंवा सुरवातीस निवृत्तीमार्ग अवलंबिण्यास हरकत नाही. मात्र प्रवृत्तिमार्ग हा निववत्तिमार्गसाधक असणे आवश्यक आहे.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*