विवेकावरील अज्ञान पटल दूर करून परमात्मा म्हणजेच परमसुख जाणून घेण्यासाठीच प्रयत्न करावेत. परमसुखाची दृढ इच्छा मनात धरून त्याच्या प्राप्तीसाठी एकसारखे अविरत प्रयत्न केल्यास मनांत दृढ झालेली विषयांची ओढ आपोआपच नष्ट होईल. मन शुध्द होऊन ते परमसुखानुभवास योग्य होईल. मानवालाच मनःशुध्दी साधने शक्य असल्यानेच मानवी जीवनाचे ध्येय जे परमात्मपद ते मिळवणे त्यास शक्य होईल.
जगांत सर्वत्र उद्योगांचा, कर्माचा सुळसुळाट दिसतो. कोणाकडेही पाहिले तर तो कार्यतत्पर आहे असेच आढळते. हे कशासाठी ? असा प्रश्न केल्यास निरनिराळ्या कार्याचे निरनिराळे उद्देश ऐकावयास मिळतात. सर्वांची कामे उद्योगरूपाने निरनिराळी आढळतील, त्यांचे उद्देशही निरनिराळे असतील. एकंदरीत विचार करता दोनच उद्देश संभवतात. पहिला ‘ सुखाची प्राप्ती ‘ व दुसरा ‘ दुःखनिवृत्ती ‘. सर्व कामांचा, उद्योगांचा उद्देश सुखप्राप्तीच. दुःखप्राप्तीसाठी कोणीही कांही करीत नसतो तर दुःखनिवृत्तीसाठीच प्रयत्नशील असतो. दुःख झाल्याने रडतो तो सुखप्राप्तीसाठी व दुःखनिवृत्तीसाठी. कारण दुःखाच्या वेळी रडल्याशिवाय समाधान मिळत नाही हे आपल्या निरनिराळ्या कर्मातून दृग्गोचर होते. पण खरे सुख कोणते ? त्याचे स्वरूप काय ? हे जाणून घेऊन त्याची प्राप्ती करून घेणे यासाठी उद्योगाची दिशा बदलून त्याप्रमाणे प्रयत्न करणे हे विवेकी मनुष्याचे कर्तव्य
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*