Literature

श्रीसमर्थ हा मारुतीरायाचाच अवतार

सुमारे ३५० वर्षापूर्वी हा भारत देश यवनांनी आक्रमिल्यामुळे अति भयंकर अशा परिस्थतीत होता. त्यांचे राज्य भारतभर झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला होता. त्यांच्या त्या वेळच्या अमानुष कृत्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती. औरंगजेबासारखा करारी, कट्टर धर्माभिमानी, राज्यकर्ता आपले अगणित सामर्थ्य व सामुग्री यांचा आपल्या मनाप्रमाणे वापर करून धर्मदिग्विजयासाठी निघाला होता. हिंदू हा शब्द नांवालाहि राहू नये या हिरिरीने तो बाहेर पडला होता. तो त्याच्याच रुबाबांत वावरत होता. राज्य शासक म्लेंच्छ असल्यामुळे भारतात सर्वत्र अशान्तता माजली होती. सनातन धर्मीय भयग्रस्त व त्रस्त झाले होते. सज्जनांच्या हालास पारावार नव्हता. धर्मरक्षणासाठी पुष्कळ महात्म्यांनी आत्मसमर्पणाची तयारी केली होती. अशा भीषण, घोर व अशांत परिस्थितींत, जनतेला त्राहीभगवान करणाऱ्या यवनांना वठणीवर आणण्यासाठी, त्यांचा नि:पात करण्यासाठी व लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठींच श्रीसमर्थांनी अवतार घेतला. यवनप्रणित या हाहाःकारास तोंड देण्यास अत्यन्त बलिष्ठ अशा श्रीसमर्थांच्या अवताराचीच आवश्यकता होती. अखिल भारतीय जनतेचे जीवन चिंतेने व भयाने व्यथित झाले होते. केव्हांहि कोणते संकट ओढवलें जाईल? हे सांगणे कठिण होते. विहिरीवर पाणी आणावयास गेलेली स्त्री पाणी घेऊन घरी येईल किंवा नाही याचा भरंवसा नव्हता. तसेंच कामासाठी घराबाहेर पडलेला तरुण घरी परत येईलच याची खात्री देणे शक्य नव्हते. मोठमोठ्या श्रीमंतांना आपली संपत्ति केंव्हा लुटली जाईल हेहि सांगणे कठीण होते. कोणतीहि धार्मिक कृत्य व विवाहादि मंगलसमारंभ निर्विघ्नपणे पार पडणे महाकठीण. सकाळी दर्शन घेतलेली मूर्ती पुनः त्याठिकाणी असेलच याचीही खात्री नव्हती. अशा भयानक परिस्थितीत अविवेकी व मूर्ख यवनांच्या दुष्कृत्यांनी भारतीय जनता भयग्रस्त होती. आपण आपल्या या राक्षसी कृत्यांनी सर्वांना वाकवू शकू अशी घमेंड बाळगणाऱ्या यवनांना वठणीवर आणण्यासाठी अति सामर्थ्यवान, बलिष्ठ अशा श्रीसमर्थांच्या अवताराचीच त्यावेळी आवश्यकता होती.

रामायणाचा अभ्यास करिता श्रीमारुतीरायाच्या बरोबरीचा दुसरा कोणीही त्यावेळी नव्हता असे आढळून येते. श्रीमारुतीराय हे श्रीशिवाचे अवतार. श्री शिवाचे कार्य सृष्टी संहाराचे. या जगाचा विनाश त्यांच्याकडून होतो म्हणूनच ‘महाकाल’ असे श्रीशिवास म्हणतात. श्रीशंकराकडून दुष्टांचाही संहार होत असतो. कारण ती संहारकार्याचीच देवता. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन या कार्यासाठीच अवतार घेतला होता. म्हणून महाभारतीय युद्धात अर्जुन धर्मयुद्धास विन्मुख झाला असता त्यांनी त्यास आपल्या विरावेशाने “कालो$स्मि लोकक्षयकृत प्रवृद्ध:” असे सांगून काल, रुद्र इत्यादी माझीच आहेत असेही त्यांनी भग्वदगीतेंत सांगितले आहे. विश्वोत्पत्तीकार्य श्रीब्रह्मदेवाचे, विश्वसंरक्षण कार्य श्रीविष्णूचे व संहारकार्य श्रीशंकराचे आहे. एखादे वेळी श्रीविष्णूंनी अवतार घेऊन संहारकार्य ठरवले तर ती शक्ती शंकराचीच असते व एखादे वेळी श्रीशंकरांनी अवतार घेऊन जनपालन कार्य तरी ती शक्ती श्रीविष्णूचीच असते. या त्रैमूर्तीचे आपापले कार्यक्षेत्र निश्चित आहे. श्रीमारुतीरायांनी जो पराक्रम गाजविला त्यास एकादश रुद्राचा अवतार होते हेच मूळ कारण होते व त्यामुळे त्यांनी चुटकीसारखे आपले संहारकार्य पार पाडले. श्रीमारुतीराय अत्यंत तेजस्वी, आदर्श, अग्रगण्य व कार्यतत्पर होते त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नव्हते. त्यांच्यावर शास्त्र-अस्त्रांचा मुळीच परिणाम होत नव्हता. “बुद्धिमंतां वरिष्ठं” याप्रमाणे ते बुद्धी व शक्तीत सर्वश्रेष्ठ होते. अमोघ ब्रह्मचर्य, अतुल आत्मबल, आदर्श स्वामिभक्तयुत श्रीमारुतीरायांचे जीवन म्हणजे स्वार्थत्यागाचे मूर्तस्वरूपच. ते जनहितदक्ष व महाबलशाली असले तरी विनयशील व स्वामीभक्त होते. यापेक्षा त्यांचे आणखी काय वर्णन करावे? ते अनुकरणीय अशा सर्व सद्गुणांनी युक्त होते. त्यांच्या जीवनात एकही चूक शोधून काढणे अशक्य आहे. असे असले तरी त्यांनी आपली बुद्धी, शक्ती व सामर्थ्य यांचा कधीही दुरुपयोग केला नाही हेच तर महात्म्याचे व अवतारी पुरुषांचे विशेष लक्षण. जन्मतःच हि लक्षणे दिसत होती. जन्मतःच सूर्याकडे पाहून ‘ते एक फळ असावे’ असे समजून ते त्यास धरावयास गेले. हे त्यांच्या साहसी वृत्तीचेच उदाहरण आहे.

यवनांनी सुरु केलेल्या कृष्ण व राक्षसी कृत्यांनी त्राहिभगवान झालेल्या भारत देशातील भीती, अंधःकार, दुर्बलता हि समूळ नष्ट करण्यासाठी सामर्थ्यवान व्यक्ती कोणती? अशी देवसभेत चर्चा चालू असता श्रीमारुतीरायच या कार्यास योग्य आहेत असे ठरून त्यांना भूतलावर अवतार घेण्यासाठी पाठविण्यात आले. तेच आपले श्रीसमर्थ रामदास होत.

श्रीसमर्थ हे श्रीमारुतीरायाचे अवतार होते हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने श्रीसमर्थसमकालीन संतमहंताचे वाङ्मय अवलोकन करणे आवश्यक आहे. अवतारी पुरुषास आपण पूर्वजन्मी कोण होतो या गोष्टीची आठवण असते व ते त्या गोष्टीचा उच्चार निरनिराळ्या प्रसंगी करीत असतात. श्रीसंत तुकाराम महाराज व श्री समर्थ यांच्या ग्रंथातून हेच सिद्ध होते. श्रीतुकाराम महाराजांच्या “पुच्छ कळवळीं कटी माजी” या एका अभंगातून हे उघड होते. श्रीरंगनाथ स्वामींनीसुद्धा श्रीरामप्रभू व श्रीमारुतीराय हे एकच होते हे सिद्ध करण्यासाठी “रायादिराय अवतरला जगदोद्धारा” असे म्हणले आहे. भक्त आणि भगवंत यात भेद नाही. नारदसूत्रात “तस्मिन सज्जने भेदाभावात” असे म्हटले आहे. यावरून श्रीरामराय व श्रीमारुतीराय यात भेद नव्हता हे स्पष्ट होते. श्री रामप्रभूंनी कृष्णा नदीच्या बाबतीत श्रीमारुतीरायांना “कृष्णातीरी वास करून नेहमी पादस्पर्शास अनुकूल असे वातावरण ठेवावे” असे सांगितले होते. यावरून त्या त्या परिस्थितीत योग्य ती देवता अवतार घेते असे स्पष्ट होते. अशा रीतीने विचार करीत असता यवननाशासाठी बलिष्ठ अशा श्रीमारुतीरायांना अवतार घेणे इष्ट होते व म्हणूनच श्रीसमर्थरूपाने त्यांनी अवतार घेतला. श्रीसमर्थांनी निरनिराळ्या प्रसंगी “मी मारुतीराय आहे” असे स्पष्ट म्हणले आहे. त्याच्याच पुष्टीसाठी काही उदाहरणे सांगतो.

सातारा जिल्ह्यात शहापूर नावाचे एक गाव आहे. तेथील कुळकर्णी यांची पत्नी सतीबाई य नावाची होती. ती अत्यंत नास्तिक व कजाग होती. दाराशी कोणीही भिक्षेकरी आल्यास त्याला भिक्षा न देता त्याला वाईट साईट बोलावयाची. पण श्रीसमर्थांच्या अतुल सामर्थ्याचा अप्रतिम प्रभावाने व तपोबलाने तिला उपरती झाली. त्या स्त्रीला श्रीसमर्थांनी श्रीमारुतीरायांच्या स्वरूपात दर्शन दिले असे सांगतात; ती गोष्ट अशी. एके दिवशी श्रीसमर्थ सतीबाईच्या घरी भिक्षेस गेले. श्रीसमर्थांच्या मुखातून रामनामाचा गाजर ऐकताच तिला अत्यंत राग आला व ती तोंडास येईल ते बोलू लागली. “माझ्या भरल्या घरात रामाचे अभद्र नाव का घेतोस? असे म्हणून तिने आपल्या हातातील पोतेऱ्याने श्री समर्थास मारिले.
त्यावेळी श्री समर्थ फक्त हसले व पुढे निघून गेले. नंतर दररोज भिक्षेस बाहेर पडताना प्रथम तिच्या दारी येऊन मग पुढे जावयाचे असा कार्यक्रम सुरू केला व सतीबाईच्या स्वभाव-
धर्माप्रमाणे तिचाहि कार्यक्रम चालू होता. असें चालले असता एके दिवशी काही कारणामुळे तिच्या नवऱ्यास राजाज्ञेवरून अटक |झाली. त्यावेळी तेथे बिदरच्या बादशहाचे राज्य होते. श्रीसमर्थ नेहमीप्रमाणे त्या दारी आले असतां नित्याचा गडगडाट व अनुभव मिळाला नाही. या गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटले व ओसरीवरहि कोणी नाहीं असें पाहून ते घरांत शिरले. अतर्गुहांत घरांतील सर्व मंडळी एकत्र व दुःखी असलेली आढळून आली. त्यावेळी हा काय प्रकार आहे? याबाबत चौकशी करितां नेहमीच्या रागीट तुसडेपणाचा अभावच आढळला. संकटकाली फक्त परमेश्वरच वाली असतो असे मनांत आणून व कोण, कोणत्या वेशाने व निमित्ताने येतो हे कळणे कठीण, असा विचार करून सतीबाईने झालेली सर्व हकिकत श्री समर्थास सांगितली. अशा वेळी तरी या बाईस देवाची आठवण झाली हे भाग्यच होय, असा श्रीसमर्थानी विचार करून त्या स्त्रीस “तुझे पति आठ दिवसांत घरी सुखरूप आल्यास तू भक्तीनें श्रीराम-
नाम घेशील काय ? तू भक्तीने श्रीरामनाम घेण्याचे कबूल केले तर तुझे पति आठ दिवसांत घरी परत आणीन असे मी आश्वासन देतो. एवढेच नव्हे तर राजदरबारी त्याचा सन्मानहि होईल.
असें म्हणाले. ते बोलणे ऐकून त्यावर विश्वास ठेवून ” मी असे करीन” अशी तिनें कबुली दिलो. कारण बिकट परिस्थितीत माणसाचा हटवादीपणा नाहीसा होत असतो. ‘बुडत्याला काडीचा
आधार’ अशी म्हण आपल्या सर्वांना माहित आहेच. असो. अशा रीतीने त्या सर्व मंडळींनी श्रीसमर्थांच्या धीर देणाऱ्या भाषणावर पूर्ण भरंवसा ठेवून त्याप्रमाणे वागण्यास निश्चयाने सुरवात केली. मात्र श्रीसमर्थांना “तुम्ही तुमचे म्हणणे खरे करून दाखवा” एवढी
विनंति केली. त्यावर ‘तुझे पति बहुमानाने खचितच घरी परत येतील’ असे खात्रीपूर्वक सांगून श्रीसमर्थ बिदरच्या बादशहाच्या दरबारी निघून गेले व तेथे आपल्या तपश्चर्येने, आत्मबलाने व श्री प्रभुरामरायाच्या अतुल भक्तीने विचित्र घटना सुरू केली. कुळकर्णी यांच्यावरील आरोपाचे कागद बादशहासमोर हजर करून तो निरपराधी आहे हे आपल्या बुद्धिचातुर्याने सिद्ध करून दिले. त्यांचे भाषण ऐकून बादशहा खूष होऊन त्याने “कुळकर्णी निरपराधी आहे. याकरिता त्याला मुक्त करून व त्याचा बहुमान करून त्याच्या घरी पोहोंचते करावे” अशी आज्ञा केली. नंतर कुळकर्णी व श्री समर्थ हे बरोबरच घराकडे येण्यास निघाले. रस्त्यांत कुळकर्णी यांनी “आपण कोण आहात? आपण कोठून व कशाकरिता आलात? आपण माझ्यावर हे उपकार कशासाठी केलेत ? या सर्व गोष्टीचा उलगडा करून आपण आपला परिचय करून द्यावा म्हणजे मी धन्य होईल. तसेच आपल्या या उपकाराची फेड मी कशी करावी तेहि कृपाकरून सांगावे” असे श्रीसमर्थास विचारले. त्यावर ‘मी तुझ्या सासुरवाडीचा गुमास्ता असून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आलो होतो.’ इतकेच सांगून श्रीसमर्थ थोड्याच वेळांत तेथून नाहीसे झाले. कुळकर्ण्यास ते नाहीसे झाल्याचे आढळताच ‘हे भूत, पिशाच्च, दैवत यापैकी काहीतरी असावें’ अशी शंका येऊन तो घाबरून गेला व त्याचा छडा लावण्याबद्दल विचार करीत करीत व चौकसपणे इकडे तिकडे पहात पहात तो घरी पोहोंचला. घरांत शिरताच आपल्या पत्नीस ‘तुझ्या माहेरी कोण गुमास्ता आहे बुवा ! त्याने माझ्यावर फार उपकार केलेत. तो कोणच्या गांवचा ? तो तुझ्या ओळखीचा आहे काय ? त्याला भेटल्याशिवाय आपल्याला मुळींच समाधान वाटणार नाही. इतकेच काय ? तो भेटल्याखेरीज मी अन्नग्रहण करणार नाही. त्याने मला प्राणदान दिलंय. खरोखर त्याच्या बुद्धिचातुर्यानेच मी तुम्हांस भेटू शकलो’ अशा प्रकारे कुतुहलाने निरनिराळे प्रश्न केले. त्याचे बोलणे ऐकून त्याची पत्नी गोंधळून जावून “तुम्ही काय बोलता ? माझ्या माहेरी कोणीहि गुमास्ता नाही. तुम्ही काहीतरीच बोलता. माझ्या माहेरचे कोणी आले होते हे मुळीच खरे नाही.” असे म्हणाली. ते ऐकून ‘अगं तू पाहिले नसशील, सासऱ्यांनी त्यांचा माणूस नक्की पाठविला होता. हे तो आवर्जुन म्हणाला. इतक्यांत घरांतील एका म्हातारीने ‘कोण असणार? आपल्याकडे भिक्षेस येतात तेच असतील. त्यांनीच यांना आठ दिवसात परत आणतो असे सांगितले नव्हते का?’ असे मध्येच सांगितलें. हे ऐकताच ‘तेच असणार! दुसरे कोणीहि महात्मे असण्याची शक्यता नाही. त्यांच्या दर्शनाखेरीज मी आतां पाणीहि पिणार नाही.’ असे म्हणून कुळकर्णी बसून राहिले. अर्थातच सर्वज्ञानी श्रीसमर्थास हे कळले. “सज्जनस्य हृदयं नवनीतम्” या सुभाषिताप्रमाणे त्यांना इतरांचे दुःख कसे सहन होणार ! हा गृहस्थ अन्नपाण्यावांचून व्रतवैकल्यासाठी बसल्याप्रमाणे एकाग्र चित्ताने बसलेला पाहून त्यांना त्याची दया आली व ते प्रगट झाले. श्रीसमर्थांना पाहताच घरांतील सर्व मंडळींच्या आनंदास पारावार राहिला नाही. घरांतील एखाद्या मनुष्याचे गेलेले प्राण परत आल्यावर जो आनंद होतो त्याप्रमाणेच त्यांना अत्यानंद झाला. मोठया आनंदाने त्यांनी श्रीसमर्थांची पाद्यपूजादि सत्कार करून त्यांच्या प्रसादाचा स्वीकार केला. श्रीसमर्थ त्यांच्या घरी काही दिवस मुक्काम करून होते. मधून मधून ते त्या गांवाजवळील टेकडीवर जाऊन बसत असत. त्या टेकडीवर एक गुहा होती व ती आजहि आहे. एके दिवशी कुणालाहि न कळत श्रीसमर्थ त्या गुहेत जाऊन ध्यानस्थ बसले, ते ३-४ दिवस परत आलेच नाहीत. कुळकर्णी यांच्या घरची सर्व लहान थोर मंडळी श्रीसमर्थांचे पादतीर्थ घेतल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत. श्रीसमर्थ न आल्याने घरातील बालगोपाल मंडळींनींहि दुध पिणे बंद केले व सर्वांनाच त्या अवधीत उपास घडले. हे पाहून सतीबाईस वाईट वाटून ती श्रीसमर्थांच्या शोधासाठी बाहेर पडली. श्रीसमर्थ कोठे असतील? कोठे बसले असतील ? असा विचार करीत करीत काट्याकुटयांची पर्वा न करितां तिने गांवांजवळची सर्व एकांत स्थळे धुंडाळून काढली. दूर अंतरावर गेल्यावर “श्रीराम जयराम जयजयराम” असा तीन वेळा आवाज ऐकू आला. तो ऐकताच तिला अत्यानंद होऊन ‘श्रीसमर्थ इथेच कुठेतरी असले पाहिजेत असें सहजपणे म्हणून पुढे गेली. समर्थांचे दर्शन होतांच त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे पाय तिने धुवून काढले. तिची स्थिति श्रीसमर्थांच्या ध्यानात येऊन त्यांनी दयेनें “बाळे ! इतके कष्ट घेऊन इथे कशासाठी आलीस? तुझा चेहरा तर उतरलेला दिसतोय !! जेवली नाहींस वाटतं. कशासाठी आलीस?” असा प्रश्न केला. “स्वामी! आपले पदतीर्थ घेतल्याशिवाय अन्नग्रहण करावयाचे नाही असा माझ्या घरातील सर्वांचा नियम आहे. तरी आपण आतां घरी येऊन आमच्यावर अनुग्रह करावा !” अशी तिनें प्रार्थना करतांच श्रीसमर्थांनी “मला किनई फारच भूक लागली. घरापावेतों येण्याचा माझ्या अंगात त्राणच नाही. तू येथेंच स्वयंपाक करून मला जेवू घाल. मग मी तुझ्या घरी येईन’ असे सांगितले. हे ऐकून “येथे स्वयंपाक कसा करणार? येथें भांडी, धान्य, सरपण तर काहीच नाही. मग स्वयंपाक कसा करावयाचा?” असें सतीबाई म्हणाली. त्यावेळी श्रीसमर्थांनी “हे पहा ! त्या समोरच्या दगडाखाली सर्व काही आहे. ते घेऊन ये” असे म्हणून माध्यान्ह-आन्हिक उरकून देवास नैवेद्य दाखविला. जेवावयास बसण्यापूर्वी “बाळ ! मी आता जेवतो. जेवण संपेपर्यंत तूं माझ्याकडे पाहू नकोस कारण तुला भीति वाटेल. ध्यानस्थ बस ! ” असे तिला सांगून ते जेवावयास बसले. काही झाले तरी स्त्रीबुद्धि चंचलच, आपल्याला असें कां सांगितले ? पाहिले तर काय होईल ? कधीहि असे न सांगणाऱ्या श्रीसमर्थांनी आजच असे का सांगितले ? अशा तिच्या मनात नाना शंका येऊन, ‘पाहू या. जर चुकले तर क्षमा करा असे सांगू?’ असा विचार करून तिनें श्रीसमर्थांकडे हळूच पाहिले. त्यावेळी श्रीसमर्थ तिला श्रीमारुतीरायाच्या स्वरूपात दिसले. ती भव्य मूर्ति पहातांच ते तेज सहन न होऊन सतीबाई मूर्च्छित झाली. हे समर्थांच्या लक्षात येताच जेवण संपवून, आचमन करून तिच्या अंगावर तीर्थ प्रोक्षण केले, गुरू ही आईच. आपण गुरुमाउली असे म्हणतोच. मुलाने किती जरी चुका केल्या तरी आई त्याला क्षमा करून योग्य ते मार्गदर्शन करीत असतेच. गुरूची आज्ञा उल्लंघन केल्यास काय होते हे सतीबाईच्या ध्यानी यावे यासाठींच श्रीसमर्थांनी श्रीमारुतिरायाचे रूप धारण केले होते.

तुम्हाला अशीच आणखी काही उदाहरणे सांगतो. वामनपंडित नावाचे एक मोठे विद्वान गृहस्थ होते. श्रीसमर्थांचे तपोबल पाहुन ते त्यांच्या भजनीं लागले. काही दिवस श्री समर्थांशी पारमार्थिक विषयावर चर्चा करून दासबोधांत वर्णन केलेल्या १४ ब्रह्माच्या लक्षणांचे विवरण चालू असतां “हे कोणत्या उपनिषदांत आहे ? ” असा वामनपंडिताने प्रश्न केला. त्यावेळी समर्थांनी ” खं ब्रह्म, साक्षि ब्रह्म. ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म. असे निरनिराळे ब्रह्म शब्द अनिर्वाच्य आहे असे गृहित धरून लिहिलेले आहेत” असे सांगितले असतानाहि वामन पंडितानें तोच तो प्रश्न वारंवार केला, त्यावेळी नुसत्या स्पष्टीकरणाने याची समजूत पटणार नाही असा विचार करून श्रीसमर्थ श्रीमारुतिरायाच्या स्वरूपात प्रकटले. तें भव्य रूप पाहतांच वामन पंडिताची घाबरगुंडी उडाली व त्यांनी ” तुम्ही म्हणतां तेंच बरोबर आहे ” असें कबूल केले. अशारीतीने वामन पंडितासहि श्रीमारुतिरायाच्या स्वरूपांत श्रीसमर्थांनी दर्शन दिले होते.

श्रीसमर्थ सज्जनगडाजवळील ब्रह्मारण्यांत तप करीत असतां त्यांत विघ्न आणण्याकरितां देवेंद्रानी उर्वशीला पाठविले होते. त्या वेळी ते श्रीमारुतिरायाच्या रूपात तिच्यापुढे उभे राहताच, ते भयानक रूप पाहून तिचे पाण्यात रुपांतर झाले व तीच आजची ‘उरमोडी’ नदी होय.

एकदा श्रीसमर्थ स्वयंपाकघरांत जेवावयास बसले असता त्यांची शिष्या वेणूताई काही वस्तू घेण्याताठी तेथे आली असतां श्रीसमर्थ श्रीमारुतिरायाच्या रूपाने जेवत असलेले तिने पाहिले व त्यायोगें तिला श्रीमारुतिरायाचे दर्शन घडले.

एकदा श्री शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना तेथे किर्तने चालू होती. या किर्तनांत श्रीसमर्थ उपस्थित असते तर बरे झाले असते असा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार पूर्ण होतो न होतो तोच श्रीसमर्थ तेथें प्रकट झाले. कीर्तन संपल्यावर श्रीसमर्थ जावयास निघाले. त्यावेळी श्री शिवाजी महाराजांनी “इतक्या भलत्या रात्री आपण कोठे जाणार ?” असा प्रश्न करतांक्षणींच ” हे पहा !! ” असे म्हणून एक पाय पन्हाळ्यावर तर एक पाय सज्जनगडावर असे श्री समर्थांनी स्वरूप धारण केल्याचे श्री शिवाजी महाराजांस दिसले.

श्री समर्थ रामदासस्वामींचा जयजयकार असो !!

– श्रीधर संदेश (माघ १८८५)
सन १९६४

home-last-sec-img