श्री भवानराव नेर्लीकर
श्रीस्वामीजी इंदूरला जाणार होते. मुंबईस जावून पुढील प्रवासाची तिकिटें रिझर्व करण्याचे काम मजकडे सोपवले होते. मोठ्या खटपटीने पहिल्या वर्गाची ९ तिकिटें रिझर्व करून एक जादा बोगी जोडणेची व्यवस्था झाली होती. श्री. मामा काण्यांचा पत्ता मजजवळ होता. श्रीस्वामीजींचे सकाळचे आन्हिक उरकण्यासाठी मुंबईस ठिकाण पाहिजे होते. मी श्री. मामा काणे यांचेकडे गेलो व सदर विषय काढतांच श्री. मामा काणे यांनी सांगीतले की ‘८ दिवसापूर्वी मला जागेपणी श्रीस्वामी क्षणभर दिसले व म्हणाले की दिनांक १४ ते २१ पर्यंत काय घडते ते पहा. मी त्यांची वाट पहात आहे.’ नंतर त्यांनी लगेच एका स्वतंत्र प्रशस्त जागेची सोय केली. एवढ्यांत श्रीस्वामीजी आले. श्री. काणे यांना आनंद झाला. त्यांना प्रचिति मिळाली. तत्पूर्वी फक्त एकदांच केवळ स्नेह्याच्या आग्रहावरून दर्शनासाठी श्री. काणे वरदहळ्ळीस गेले होते.
नेर्लीजवळील एका शेतकऱ्याचा २००० रु. चा बैल पायांत अधू झाल्याने त्याने विक्रीस काढला. त्याला गि-हाइक मिळेना. सदर शेतकऱ्याची गांठ पडली असता मी मंत्राक्षता अधू पायास बांधण्यास दिल्या. त्याने बैल बरा झाला. तो त्याने विकला. १८०० रु. किंमत आली. “श्रीस्वामीजींवर ज्यांची श्रद्धा न निष्ठा आहे त्याना त्याच्या प्रचित्या पदोपदी येत असतात.
कोल्हापूरजवळ दिंडोलीच्या एका गृहस्थांचे घरी मुलीचे लग्न होते. माझ्या मंत्राक्षता मुलीवर टाक’ असा दृष्टांत त्यांना झाला. त्याप्रमाणे त्यानीं केलें. अशी अनेक उदाहरणे प्रत्यहि घडत असतात.