आनंद माधव मराठे
शके १८८१ च्या ज्येष्ठ वद्य चतुर्थीस माझे आईवडील श्रींच्या दर्शनासाठी सज्जनगडावर गेले होते. तेथे गेले असतां ‘आपण श्रींच्या चरणपादुका मागाव्यात‘ अशी इच्छा माझ्या मातोश्रींना झाली व त्यांनी तेथील एका शिष्यास विचारता ‘कोणाला पादुका द्यावयाच्या या संबंधी बरेच वाद व मतभेद सुरू आहेत. स्वामीजी आपणांस नव्हे, कोणालाही पादूका देणार नाहींत. तेव्हा आपण मागणी करूं नये.’ असें माझ्या मातोश्रीस सांगण्यांत आले. पण त्याच रात्रीं श्रींनी आईच्या पदरांत प्रसाद म्हणून पादुका दिल्याचे स्वप्न तिला पडले. दुसऱ्याच दिवशी आईने श्रींच्याकडे पादुकांची मागणी केलो. स्वामीजी तिला दुसऱ्या पादुका देत होते. पण आईने ‘आपल्या पायांत सध्या वापरात असलेल्या व निदान सहा महिने ज्या वापरीत आहांत त्याच पादुका पाहिजेत‘ असे म्हटल्यावर स्वामीजींनी शेजारी बसलेल्या वे. मु. खरेशास्त्रींना विचारले की, एकदा पुन्हा पहा की यांची जागा पादूकांना योग्य आहे का ? आणि अर्धा तास त्या दोघांत याबाबत चर्चा होऊन पादुका देण्याचा निर्णय घेण्यात आला व श्रींनी आपल्या पायांतील पादूका माझ्या आईस सपूर्त केल्या व प्रत्यक्ष श्रीदत्तमहाराजच आमच्या घरात आले.
श्रीस्वामीजी रत्नागिरीस आमच्याकडे वद्य दशमीस आले होते. या तिथीची आठवण म्हणून पादुकावर प्रत्येक वद्य दशमीस अभिषेक करून महापूजा करीत होतो. सुरवातीस यासाठी ५०–६० ब्राह्मण उपस्थित असत श्रीसूक्त, रुद्रसूक्त, पुरुषसूक्त, पवमानादि सूक्तांनी अभिषेक व रात्री महाप्रसाद हे ओलेत्याने वाळत घातलेले वस्र नेसूनच चाले. साधे सोवळे चालत नसे. आजहि आमच्या घरांतील किंवा श्रींच्या शिष्यवर्गाशिवाय इतर कोणालाहि पादुकांना स्पर्श करावयास अनुमति नाहि. ओलेत्याने वाळत घातलेले वस्त्र ओलेत्याने नेसावे किंवा प्रथम धावळी नेसून मग वस्त्रास स्पर्श करून धावळी बदलूत ते नेसावयाचे असे कडक सोवळे आहे. आम्ही याप्रमाणे दर महिन्याच्या पूजा बारा वर्षे व्यवस्थित पार पाडल्या. एकाहि वद्य दशमीस अडचण आली नाही. त्यावेळी घरातील एखादी मरायला घातलेली व्यक्ती पूजा पार पडल्यावर महाप्रसाद होवून तीर्थ पोटांत गेल्यावरच मृत झाली. जन्माला यावयाचे मूलहि या दशमीच्या अगोदर वा नंतर १५ दिवसाच्या अंतरानेच जन्मले. दशमीचा हा सोहळा अपूर्व असाच होता. आमची खात्री आहे की, स्वामीजी त्या दिवशी येथे असावयाचेच. याशिवाय श्रीदत्त जयंती, महाशिवरात्र (या दिवशी रात्री ४ यामाच्या चार पूजा होत.)
गुरुपौर्णिमा व गुरुद्वादशी अशाहि महापूजा होत असत.
सध्या वर्षांतून श्रीदत्तजयंती, श्रीगुरुपौणिमा व श्रींची पुण्यतिथी असे तीन उत्सव होत असतात. पैकी श्रीदत्तजयंती व श्रीगुरुपौर्णिमेस सूर्योदयापासून श्रीपादुकांवर रुद्रसूक्ताभिषेक सुरु होतो. त्याचवेळी गुरूचरित्राची व श्रीगजानन महाराज पोथीचे सामुहिक पारायणे सुरू होतात. हे कार्यक्रम संध्याकाळपावेतो चालतात व उरलेले उपचार होऊन रात्री दहा वाजता महाआरती व महाप्रसाद (पुरणपोळी) होतो.
श्रींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळीच श्रींच्या पादुकांची महापूजा होऊन दुपारी बारा वाजता महाप्रसाद होतो. यावेळी ठरलेलेच ब्राह्मण असतात व त्यांना स्वामीजींना अभिप्रेत असलेल्या सोवळयातच यावे लागते.
पादुकांचा नित्य कार्यक्रम म्हणजे पादुकांना फक्त सुगंधी तैलस्नान. रोज पाण्याचा स्पर्श होत नाही. रोज रुद्र, सौर, पूरुषसूक्त, मन्यूसूक्त इत्यादि सुक्ते व गणेश अथर्वशीर्ष यांचा अभिषेक रोज असतो. आम्ही दोघे भाऊ व वडील या सर्वांना जरुरीपुरते वैदिक ज्ञान आहे. रोज वैश्वदेव असतो. कारण स्वामीजी आले त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री स्वामीजी अचानक घराबाहेर चालत जाऊन तेथे सपशेल आडवे झोपले आणि म्हणाले की, ‘या घरात वैश्वदेव होत नाही. बाहेरील दुष्ट शक्ति घरांत अनर्थ करण्यासाठी, अन्न दूषित करण्यासाठी येत होत्या म्हणून मी इकडे आलो व त्यांना अडविले. वैश्वदेवाविना अन्नग्रहण करू नका!’ त्या दिवसापासून वैश्वदेव सुरू झाला.
श्रींच्या पादुका आल्यापासून आजहि काही अडचणी, संकटे आल्यास केवळ श्रींच्या स्मरणानेच त्यांचे निराकरण होते. आमच्या येथेहि दुःखी जीव येतात. ‘या दृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादशी‘ । यास अनुसरून प्रत्येकाचे दु:ख कमी होते, अडचणी निवारल्या जातात.
आम्ही आमच्या स्वार्थासाठी म्हणा, किंवा पुढे आपणास अकारण महत्व प्राप्त होऊन अहंकार उत्पन्न होईल म्हणून म्हणा, श्रींची जास्त प्रसिद्धी, मंदीर बांधणे, पादुकांचे महत्त्व सांगणे या गोष्टी करीत नाही. अन्यथा आमचे घर सर्वांसाठी खुले झाले असते व आम्हालाहि खूप कमाई झाली असती. पण स्थानाचे पावित्र्य व आमची भावना कमी झाली असती.
येथे पादुका आहेत म्हणजे स्वामीजी आहेत यात तिळमात्र शंका नाही.
भगवान श्रीधर स्वामी महाराजांचा जयजयकार असो !!
– श्रीधर संदेश (श्रावण १९०८)
सन १९८६