अ. शं. दावलभक्त, पुणे
॥ श्रीराम समर्थ ॥
ही अंदाजे १९६०–६१ मधील घटना असावी. सातारा येथील एका माहेरवाशीण बाईला सारखा रक्तस्त्राव चालू होता. त्यामुळे तिला झोळीत घालून मरणोन्मुख स्थितीत सासरच्या माणसांनी डॉक्टरी उपायांसाठी साताऱ्यास आणले. तिचे मातापित्यांनी सांगितले की, ‘हिला डॉक्टर काय करणार ? सज्जनगडावर देव डॉक्टर आहे. हिला तिकडे घेऊन चला‘. त्याप्रमाणे ते गडावर आले. श्रीस्वामींना तिच्या पालकाने दंडवत घातला व ‘हिला वाचवा‘ म्हणत स्वामीजींची प्रार्थना केली. स्वामीजी म्हणाले, ‘मी स्नानाला निघालो आहे. माझ्या स्नानाचे पाणी बाहेर पडेल ते तिच्या झोळीत तिच्या अंगावर पडेल असे करा‘ स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केले. तिच्या देहावर स्वामीजींचे हे तीर्थ पडतांच ती उठून बसली. रक्तस्त्राव थांबला. मग तीला उचलून श्रींच्या दर्शनास आणले. स्वामीजींनी तिच्या मागे असलेली पीडा काढून टाकली. त्यांच्या कृपा आशीर्वादाने ती पूर्णपणे बरी झाली. हाच अवतारी पुरुषाचा महिमा ! सर्वच अगाध ! देवाला जे करतां येत नाही ते संतकृपेने होऊ शकते याचेच हे उदाहरण !?
– श्रीधर संदेश (कार्तिक १९०८)
सन १९८६